Thursday, February 23, 2012

भारत माझा देश आहे


"जहाँ डाल डाल पर
सोने की चिडियाँ
करती है बसेरा
वो भारत देश है मेरा।"

अशा ओळी कधी काळी भारतात गुणगुणल्या जात होत्या.भारतातून सोन्याचा धूर वाहतो अशी या देशाची महती गायली जात होती.आसेतुहिमाचल भारताचे’ वर्णन निरनिराळ्या देशातील कवींनी केले.


वाल्मिकिंनी रामराज्याचे,रविंद्रनाथांनी ’Heaven of freedom'चे तर रामदासांनी आनंदवनभूवनचे स्वप्न फार पूर्वीच पाहिले होते;पण प्रत्यक्षात मात्र ते उतरले नाही आणि उतरले असले तरी काळाच्या ओघात वाहून गेले.प्राचीन काळापासून माझा देश सर्वच बाबतीत समॄद्ध होता,त्याची किर्ती जगभर पसरली होती,पण ती कीर्ती कधी अपकीर्तीत बदलली कळलेच नाही.आज माझा देश वाढती लोकसंख्या,बेकारी,रोगराई,गरिबी या दुष्ट प्रवृत्तींचे ठाणे म्हणून ओळ्खला जातो.या ओळखपत्राला नष्ट करून २१व्या शतकातील भारताची जडणघडण आजवर आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्यावरून बोध घेऊन व निसर्गाच्या वरदानाचा पुरेपूर फायदा घेऊन आपण करावयांस हवी.

आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे, आज ऑफ़िसमधून घरी येत असताना समोरच्या गाडीतला एक माणूस पचकन रस्त्यावर थूंकला,थोडं पुढे गेले आणि एका गाडीत मागे बसलेल्या मॅडमनी बिस्किट खाल्लं आणि कागद मात्र रस्त्यावर टाकला..पोशाखावरून,गाडीवरून दोन्ही माणसं चांगल्या घरातली,चांगली शिकलेली दिसत होती..असा संताप झाला ना...मनात आलं, त्यांना जाऊन म्हणावं एवढी मोठी गाडी आहे स्वत:ची तर त्यातच घाण करावी..
पण असं कसं करणार ना कुणी,कारण गाडी माझी,हक्काची..तिची काळजी घेणं माझं कर्तव्य..
पण देश माझा नाही,रस्ता माझा नाही..फ़क्त लहानपणी शाळेत प्रतिज्ञेत म्हणण्यापुरताच ’भारत माझा देश आहे’ हे वाक्य होतं.
१० वर्ष हे वाक्य नेमानं रोज म्हटलं,पण कृतीतून मात्र ते उतरवता येत नाही..
घर माझं म्हणतो तेव्हा ते स्वच्छ ठेवतो ना,त्या घरात घाण करत नाही..देश माझा म्हणतो पण घरातला कचरा मात्र रस्त्यावर आणून टाकतो.
कुणी चुकिच्या साईडनी ओव्हरटेक केलं कींवा सुसाट वेगानं गाडी चालवत गेलं तर हेच लोकं त्याला हमखास म्हणणार की तुझ्या बापाचा रस्ता आहे का??पण हे म्हणताना ह्यांना हे कळत नाही की जसा रस्ता त्याच्या बापाचा नाही तसा ह्यांच्याही बापाचा नाही ,तेव्हा रस्त्यावर घाण करण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला.??

हेच लोकं परदेशात गेल्यावर मात्र अगदी कटाक्षानं कचरापेटिचा वापर करतात.. परका देश ह्यांना स्वच्छ ठेवता येतो पण स्वत:चा देश खराब करताना मात्र थोडीसुद्धा लाज वाटत नाही..

"हि रम्य सिंधू वलयांकित हिंदूभूमी
शोभे नितांत रमणीय सुवर्णभूमी।
विश्वात आज तिजला करण्या समर्थ
तू राष्ट्र राष्ट्र जप मंत्र निजांतरात॥"

आज गरज आहे ती आपल्या देशातल्या प्रत्येक नागरीकाने ह्या मंत्राचे अनुकरण करण्याची..
आजपासून देशाला बदलवण्याची सुरूवात स्वत:च्या घरापासून करूया..
परक्यांना नाही पण आपल्या जवळच्या माणसांना देश खराब करण्यापासून नक्कीच थांबवू शकतो..
आणि मग अभिमानाने म्हणू शकतो

’मेरे पर्वत मेरी नदियॉं,मेरा देश महान है।
प्राणों से भी प्यारा मुझको मेरा हिंदुस्थान है॥



Saturday, December 3, 2011

पाऊस प्रेमाचा


ती चिंब भिजलेली,तो ही चिंब भिजलेला
त्या दोघांमधे आज पाऊस मनसोक्त बरसला..

मिठीतला बंध,रात ही धुंद,
दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब..

रेशमी स्पर्शाचे हातात हात,
दोघांची एकमेकांना मखमली साथ..

कंप ओठांना भासला
श्वासात अडकला श्वास,
प्रेमाचा पाऊस असा बरसला
हे सत्य असे की भास..

Friday, November 25, 2011

तो म्हणजे

तो म्हणजे चंद्र,तो म्हणजे तारा
तो म्हणजे मला छेडणारा उनाड वारा..
तो म्हणजे ढग,तो म्हणजे गारा
तो म्हणजे मज बिलगू पाहणार्‍या पावसाच्या धारा..
कधी तो अबोल,कधी बोल मंद हळवासा
कधी तो शांत किनारा,कधी सागर वेडापिसा..
कधी तो धडकन,कधी तो श्वास
कधी तो माझ्या मनीचा ध्यास..
कधी शोधते मी त्याला
माझ्या मनाच्या गावात..
कधी तोच भेटतो अलगद
स्वप्नी चांदण्यात..

Saturday, August 6, 2011

Rakhi

धागा हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती

औक्षिते प्रेमाने,उजळूनी दिपज्योती
प्रेमळ निखळ या नात्यात,अशीच फुलावी प्रीती

बंधन नव्हे हे तर बंध प्रेमाचे
ह्या तर तुझ्या-माझ्यातल्या हळव्या रेशीमगाठी


भावाची छाया
बहिणीची माया
अशी ही आपुल्या
नात्याची काया

रक्षाबंधनाची
रीत ही प्यारी
ह्या नात्यासम आपुल्या
तुला माझी भेट ही न्यारी

Saturday, February 19, 2011

राजा शिवाजी


नगार्‍यांच्या नादात शिवनेरी आनंदला
आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला
एकची तो राजा शिवाजी जाहला

हजारो मावळे उभे ठाकले,दिसली नवी आशा
मर्दमराठी पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा
तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला
एकची तो राजा शिवाजी जाहला

उरी बाळगूनी स्वप्न हिंदवी स्वराज्याचे
बांधूनी तोरण हजारो गड-किल्ल्यांचे
घडविले ज्याने नव्या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला

राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला

Monday, January 24, 2011

तू आणि मी

या जीवनप्रवासाच्या वाटेवरुन चालताना
तू आणि मी...

आपल्या स्वप्नातल्या घरकुल बघतोय
तू आणि मी...

गवताच्या पात्यांवरल्या मनमोहक दवबिंदूंना न्याहाळ्तोय
तू आणि मी...

पावसाच्या रिमझिम सरींना बिलगण्याचा प्रयत्न करतोय
तू आणि मी...

हिवाळ्यातलं शिरशिरणारं ऊन झेलण्याचा आनंद उपभोगतोय
तू आणि मी...

एकमेकांना आधार देण्याचा अट्टाहास करतोय
तू आणि मी...

ही सारी स्वप्नं डोळ्यात साठवून नवी सुरूवात करतोय
तू आणि मी...

या जीवनप्रवासाच्या वाटेवरुन चालताना
तू आणि मी...

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं भावना जपणारं
दु:खावर हळूच फुंकर घालणारं

कुणीतरी असावं हक्कानं रागावणारं
वेळ्प्रसंगी कौतूक करणारं

कुणीतरी असावं खूप खूप चिडवणारं
अगदी खळखळून हसवणारं

कुणीतरी असावं स्वप्नात येणारं
कल्पनेच्या नव्या जगात नेणारं

कुणीतरी असावं खूप प्रेम देणारं
जन्मभराची सोबत करणारं

कुणीतरी असावं आपलसं म्हणणारं
चुका विसरून माफ करणारं

कुणीतरी असावं अधीरतेने वाट बघणारं
उगीच रागानं रुसून बसणारं

कुणीतरी असावं मनधरणी करणारं
इच्छा-आकांक्षांना पुरून उरणारं

कुणीतरी असावं प्रेमाचं पांघरुण घालणारं
हक्काचं असं मजजवळ कुणीतरी असावं